शनिवार, ७ एप्रिल, २०१८

जैन, बौद्ध, वैदिक वगैरे:


-महावीर सांगलीकर 

-प्राचीन काळी (इसवी सन पूर्व काळात) हिंदू नावाचा कोणताही धर्म अस्तित्वात नव्हता. त्यावेळी दोन मुख्य धर्म परंपरा होत्या, त्या म्हणजे श्रमण परंपरा आणि वैदिक परंपरा. श्रमण परंपरेत जैन, बौद्ध, आजीवक आणि इतर कांही धर्म, विचार प्रवाह होते, तर वैदिक परंपरा ही ब्राह्मण परंपरा होती.

-वैदिक लोक मूर्तीपूजा न मानणारे, निसर्गपूजक होते. त्यामुळे त्यांची मंदिरे असण्याचा प्रश्नच येत नाही. स्वामी दयानंद सरस्वती यांनी मूर्तीपूजा व मंदिरे हा प्रकार जैन धर्मातून आला असे आपल्या सत्यार्थ प्रकाश या ग्रंथात स्पष्टपणे लिहिले आहे.

-श्रमण परंपरा ही प्रामुख्याने क्षत्रियांची परंपरा होती. वैदिक ब्राह्मणही या परंपरेकडे मोठ्या प्रमाणात या परंपरेकडे ओढले जात होते. त्यामुळे या परंपरेला शह देण्यासाठी वैदिकांनी वैष्णव धर्माची सुरवात केली. यात राम आणि कृष्ण यांना नायक केले. त्यांना देव बनवले. या वैष्णव परंपरेत ज्ञानापेक्षा भक्तीला महत्व दिले गेले. त्यामुळे सामान्य लोक वैष्णव धर्माकडे मोठ्या संखेने आकर्षित झाले. त्यातूनच आज ज्याला हिंदू धर्म मानला जातो तो तयार झाला.

-भारतात जे प्राचीन अवशेष सापडतात, त्यात सगळ्यात जुने अवशेष जैन आणि बौद्ध यांचे सापडतात.
-बौद्धांची मंदिरे नसत तर स्तूप व लेण्या असत. तर जैनांच्या लेण्या आणि मंदिरे असत. 

-पुढे, विशेषत: वैष्णव धर्माचे प्राबल्य वाढल्यावर अनेक जैन मंदिराचे रुपांतर (आजच्या) हिंदू मंदिरात झाले. पण याचा अर्थ हिंदुनी जैनांची मंदिरे बळकावली असे नसून जैन लोक मोठ्या प्रमाणात वैष्णव झाले आणि त्यांनी आपल्या मंदिरात राम, कृष्ण किंवा त्यांच्या एखाद्या अवतार असलेल्या मूर्तीची स्थापना केली. पण हे परिवर्तन मोठ्या प्रमाणात झालेले नाही.

-आदी शंकराचार्यांच्या काळात जैन धर्म समाजाच्या सर्व स्तरात मोठ्या प्रमाणात पसरला होता. पुढे आदी शंकराचार्यांनी जैन धर्म संपवला असे समजले जात असले तरी प्रत्यक्षात जैन धर्म 13 व्या शतकापर्यंत  भारताच्या अनेक भागात फोफावला होता. त्याचे अनेक साहित्यिक उल्लेख व ऐतिहासिक आणि पुरातत्वीय पुरावे आहेत.

-जैन धर्माचा प्रभाव कमी होण्याचे मोठे कारण म्हणजे भारतावर झालेली मुस्लीम आक्रमणे. या आक्रमणांच्या मुळे समाज आणि मंदिरे सुरक्षित राहिली नाहीत. जैन मुनींच्या विहारावर बंधने आली. त्यामुळे धर्मप्रचार थांबला.

-जैन आणि हिंदू हे कांही वेगळे लोक नाहीत, तर एकच आहेत. आज हिंदू समजले जाणारे कित्येक समाज एकेकाळी जैन होते. अगदी आपल्या महाराष्ट्रात देखील याची उदाहरणे आहेत. मोठे उदाहरण म्हणजे मातंग समाज. मध्य युगापर्यंत मराठा समाजावर देखील जैन धर्माचा मोठा प्रभाव होता. 1886 साली प्रकाशित झालेल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये त्याकाळी अनेक बलुतेदार जाती जैन धर्म पाळत असल्याचे उल्लेख मिळतात. तात्या केशव चोपडे यांच्या ‘जैन आणि हिंदू’ या पुस्तकात आजच्या कोणकोणत्या हिंदू जाती पूर्वी जैन धर्माचे पालन करीत याचे विस्ताराने वर्णन आले आहे. या पुस्तकाची pdf माझ्याकडे आहे, तुम्हाला ती हवी असल्यास samdolian@gmail.com  या पत्त्यावर इमेल पाठवून मागवून घ्यावी. 

हेही वाचा:

२ टिप्पण्या: