सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Advt.

Advt.

शुक्रवार, २० सप्टेंबर, २०१३

पुस्तक परिचय:बहुजनांच्या शिक्षणाचे कैवारी-कर्मवीर भाऊराव पाटील

 - मधुकर जाधव 
8412831025


प्रचलित आधुनिक शिक्षणाची सुरुवात भारतामध्ये पहिल्यांदा इंग्रजांनी केली. महात्मा फुले यांनी तळागाळातल्या, मागास, अस्पृश्य मुला-मुलींसाठी शाळा उघडल्या. छत्रपती शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण
मोफत व सक्तीचे केले. कोल्हापुरात वसतिगृहे उभारली. परंतु, खर्या अर्थाने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात खेड्यापाड्यात शिक्षण पोहोचविण्याचे, संपूर्ण बहुजन समाजाला शिक्षण देण्याचे काम भाऊराव पायगोंडा पाटील यांनी केले. भाऊराव पाटील आपल्या कार्याने उभ्या महाराष्ट्राच्या जनतेचे अण्णा बनले. त्यांचे कार्य एवढे महान की  लोकांनी त्यांना “कर्मवीर” हि पदवी बहाल केली. प्रत्येक माणूस, प्रत्येक महापुरुष एकमेवाद्वितीय असतोच असतो. प्रत्येकाचे कार्य निराळे. कालखंड निराळा त्यामुळे एका महापुरुषाची तुलना दुस-याशी होऊ शकत नाही. तरीही ‘रयत शिक्षण संस्थेची’स्थापना करून बहुजन समाजाला शिक्षण देणाऱ्या कर्मवीरांची तुलना ‘रयतेचे स्वराज्य’ उभारणाऱ्या छत्रपती शिवरायांशीच केली जाऊ शकते. अशा या महामानवाच्या शैक्षणिक कार्याचा आढावा व जीवनाचा परिचय  “बहुजनांच्या शिक्षणाचे कैवारी –कर्मवीर भाऊराव पाटील” या पुस्तकातून लेखक नवनाथ अनंथा शिंदे यांनी उत्तमपणे करून दिलेला आहे.

कर्मवीर अण्णांचे पूर्वज मूळचे कर्नाटकातील. कर्मवीरांच्या आजोबांना शिक्षणाचे महत्व पटल्याने  कर्मवीरांचे वडील पायगोंडा शिक्षण घेऊन महसूल खात्यात नोकरीला लागले.वडील पायगोंडा व आई गंगामाई यांच्या पोटी २२ सप्टेंबर १८८७ ला भाऊचा जन्म झाला.कर्मवीर अण्णांचे बालपण लाडात गेले. त्यांचा स्वभाव हट्टी, उनाड, बंडखोर वृत्तीचा होता.   एका शिक्षण संस्थेची स्थापना केली पाहिजे” असे विचार अण्णांनी मांडले व ‘रयत शिक्षण संस्था’ असे संस्थेचे नावही सर्वानुमते ठरले. यानंतर १९२४ मध्ये स्वतःच्या घरी ४ मुलांना घेवून वसतिगृह सुरु केले. धान्यासाठी लोकांकडून एक मूठ धान्य गोळा करण्याची मुष्ठी फंड योजना, एक झोळी योजना अशा कल्पक योजना राबविल्या. त्याचबरोबर ‘कमवा आणि शिका’हि जगातील शिक्षण तज्ञांना विचार करावयास भाग पडणारी योजना सुरु करून बहुजन समाजाच्या शिक्षणाची सोय करण्याचा मार्ग दाखविला व राबविला.

विद्यार्थीदशेत राजर्षी शाहू महाराजांचा सहवास त्यांना लाभला होता. पुढे भाऊराव सत्यशोधक चळवळीचे प्रमुख नेतेही होते. परंतु, समाजाच्या शाश्वत विकासासाठी चळवळीबरोबरच शिक्षण आवश्यक असल्याने कर्मवीरांनी कराड तालुक्यातील काले  या गावी १९१९ मध्ये भरलेल्या सत्यशोधक समाजाच्या परिषदेत “समाजातील दीन-दुबळ्या लोकांना शिक्षण मिळाले पाहिजे. शिक्षणाची गंगा बहुजन समाजापर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी बहुजनांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्यांना एकत्र आणण्याचे काम सत्यशोधक चळवळ करेल. पण शिक्षणप्रसारासाठी  इथे  एका शिक्षण संस्थेची स्थापना केली पाहिजे.” असे विचार अण्णांनी मांडले व ‘रयत शिक्षण संस्था’ असे संस्थेचे नावही सर्वानुमते ठरले. यानंतर १९२४ मध्ये स्वतःच्या घरी ४ मुलांना घेवून वसतिगृह सुरु केले.धान्यासाठी लोकांकडून एक मूठ धान्य गोळा करण्याची मुष्ठी फंड योजना,एक झोळी योजना अशा कल्पक योजना राबविल्या.त्याचबरोबर ‘कामवा आणि शिका’हि जगातील शिक्षण तज्ञांना विचार करावयास भाग पडणारी योजना सुरु करून बहुजन समाजाच्या शिक्षणाची सोय करण्याचा मार्ग दाखविला व राबविला.

मुलांच्या शिक्षणात येणारा कोणताही अडथळा अण्णांनी कायमस्वरूपी दूर करण्याचा प्रयत्न गरजेनुसार केला व तो यशस्वीही केला. लेखकाने या पुस्तकातून अण्णांचे शिक्षणविषयक कार्य सर्वांना सहज समजेल अशा सोप्या भाषेत व मुद्देसूदपणे मांडलेले आहे. युनियन बोर्डिंग हाऊस, बडोदा नरेशाची संस्थेस भेट, सिल्व्हर ज्युबिली रूरल ट्रेनिंग कॉलेज, आजन्म सेवेची दीक्षा, व्हालंटरी स्कूल योजना, दिशाहीनांना दिशा, मोफत वसतिगृहयुक्त विद्यालयाची स्थापना, डोंगरावर उभारले नंदनवन,  अनुदान बंदीचे संकट, अण्णांचे सन्मान, अण्णांची अर्धांगिनी, अखेरचा श्वास, अण्णांच्या कार्याची पताका या मुद्द्यांच्या आधारे अण्णांचे जीवन जीवनविषयक तत्वज्ञान, शैक्षणिक कार्य, त्यातील अडथळे, आयुष्यात आलेले जीवघेणे संकट इ.फार प्रभावीपणे मांडले आहे. तसेच राजर्षी शाहू महाराज, गाडगेबाबा, जिन्नाप्पा मद्वाणणा, भाऊसाहेब कुदळे, आत्माराम ओगले, लक्ष्मणराव किर्लोस्कर, प्रबोधनकार ठाकरे, म.गांधी, सयाजीराव गायकवाड, हमीद-ए-अली, महर्षी वि.रा.शिंदे, मालोजीराजे नाईक निंबाळकर, धोंडजी भोसले या व यासारख्या अनेकांनी लागणारी  मदत व अण्णांविषयी, कार्याविषयी जवळीक जपली. सगळ्यात महत्वाचे अण्णांच्या पत्नी लक्ष्मीबाई (वहिनीसाहेब) यांच्या सर्व प्रकारच्या मदत, सहभाग व पाठिंब्याशिवाय इतके आभाळाएवढे कार्य होऊ शकले नसते हेही योग्य प्रकारे लिहिले आहे. अण्णांची वचने शेवटी एकत्रित दिलेली आहेत, हे योग्यच.

शिक्षणप्रेमी वाचकांसाठी व विशेषतः हायस्कूलच्या विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करण्यासाठी उत्तम पुस्तक आहे.तरुणांसाठी आदर्श व्यक्तिमत्वाची ओळख व कार्याचा परिचय करून घेवून विधायक काम करण्याची प्रेरणा देण्या-घेण्यासाठी खूपच योग्य  व चांगले पुस्तक आहे.

लेखक: नवनाथ आनंद शिंदे
 ९८६०७४८०८३
प्रकाशक:किशोर कडू, जिजाई प्रकाशन, पुणे.
पाने-६४.   सेवामुल्य-३०/-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular Posts

कृपया हे पेज लाईक करावे